
शाहिर सगनभाऊ हे पेशवाईतील अखेरचे ज्ञात असलेले शाहिर, कोणतीही साहित्य परंपरा पाठीशी नसताना सहज सोप्या भाषेतील रचनांमुळे नावलौकिकास पात्र ठरले. शाहिर सगनभाऊ मूळचे जेजुरीचे रहिवासी, वंश परंपरेने आलेल्या शिकलगारीच्या व्यवसायात मन रमेना आणि काव्यप्रतिभा स्वस्थ बसू देईना म्हणून पुण्यची वाट धरली आणि नामवंत शाहिरांसोबत आपली कवनं सादर करू लागले थोड्याच कालावधीत यश आणि प्रसिद्धी मिळविली. सगनभाऊ जातीचे मुसलमान असूनसुद्धा ते मराठीशी, महाराष्ट्राच्या संस्कृतीशी एकरुप झाले होते, ग्रामीण जीवनशैलीशी त्यांची जी नाळ बांधली होती ती त्यांच्या शाहिरीतून दिसून येते.
उत्तर मराठेशाहीतील सर्वात मोठी घटना आणि मराठ्यांच्या मनात असणारी सल म्हणजे पानिपतची लढाई, या लढाईवर सगनभाऊनी दीर्घ पोवाडा लिहून त्याकाळातील परिस्थितीवर सुंदर भाष्य केले आहे. श्रीखंडेरायावर त्यांची अपार श्रद्धा आणि या श्रद्धेतूनच त्यांनी हिंदुस्थानातील पवित्र तीर्थक्षेत्र व देव देवतांना आपल्या काव्यामध्ये गुंफले, हीच रचना खंडेरायाच्या भूपाळी मध्ये म्हंटली जाते.

होनाजी शिलारखाने व त्यांचा गायक साथीदार बाळा करंजकर असे एकत्रित होनाजी बाळा नाव मिळाले, त्याप्रमाणेच मुस्लीम धर्मीय सगन आणि कोथळे गावचा रहिवासी भाऊ गोंधळी, हा त्याचा सहगायक होता, म्हणूनच सगनभाऊ असे नामाभिधान त्याला मिळाल्याची समजूत आहे.
आजही जेजुरीकरांच्या मनामध्ये शाहिर सगनभाऊ यांच्याविषयी आभिमान आहे, दरवर्षी ऑक्टोबर- नोहेंबर महिन्यामध्ये चार दिवसांचा संगीत महोत्सव भरविला जातो. यामध्ये ही रात्र शाहिरांची, रंगल्या रात्री अशा, लोकसंगीत आणि लोकनाट्य असे कार्यक्रम असतात. महाराष्ट्रातील नामवंत शाहिर आणि कलाकार या कार्यक्रमामध्ये हजेरी लावणे हे भाग्याचे समजतात. श्रीक्षेत्र जेजुरीच्या सांस्कृतिक क्षेत्रातील मानबिंदू असणा-या शाहिर सगनभाऊना www.jejuri.in परिवाराच्या वतीने त्रिवार सलाम....

